रत्नागिरी : ‘भारतात बांबूपासून १८ हजार कोटी आर्थिक उलाढाल होते. व्हेपर ट्रिटमेंटद्वारे बांबूचे आयुष्य वाढवू शकतो. पर्यावरणपूरक घर बांधण्यासाठी बांबूचा उपयोग करावा. आता नव्या जमान्यात घरामध्ये बांबूच्या कलाकृती ठेवल्या जातात. सिलिंग व फ्लोअर टाइल्सही बसवल्या जात आहेत. बांबूपासून बायोडिझेल व वीज निर्मिती शक्य आहे. बांबू क्लस्टर, बांबू प्रवर्तक कंपनी, अर्थसाह्य यांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे अजित भोसले यांनी केले.
येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बांबू कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्यातून शेतकरी बांबू लागवडीतून कोट्यवधी रुपये मिळवत आहेत; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांना बाजारपेठ, हमी भाव व लागवड नसल्यामुळे हे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सिंधुदुर्गातील बांबू उत्पादक अभ्यासक मिलिंद पाटील, कृषीतज्ञ डॉ. दिलीप नागवेकर उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना मिलिंद पाटील म्हणाले, ‘रत्नागिरीतील शेतकर्यांनी समूहाने येऊन सिंधुदुर्गातील बांबू नर्सरी, प्रक्रिया उद्योग पाहावेत, शेतकर्यांना भेटावे. दर दोन वर्षांआड तोड केल्यास वर्षाला एकरी एक ते अडीच लाख उत्पन्न मिळू शकते. यासाठी बाजारपेठ उपलब्ध हवी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यंदा एक हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. इथला बांबू केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राजस्थानात निर्यात झाला आहे. रत्नागिरीतील लोकसुद्धा उद्योजक बनू शकतात.’
‘बांबू लागवडीत आठ बाय १५ फुटाची जागा मोकळी ठेवावी. निचरा होणारी जमीन असावी व अति पाण्यामुळे कंद, मुळे कुजता कामा नयेत. शाखीय, पेर/कांडी रोपे व टिश्यू कल्चरने लागवड करता येते. खड्ड्यात लेंडी, शेण, पाला पाचोळा घालावा. दक्षिणेला तिरके करून लागवड करावी. खत घालावे. योग्य लक्ष देऊन लागवडीवरील वेली तोडाव्यात. पाणी जास्त दिल्यास कोंब येतात व त्यामुळे माकड, डुक्कर गवे त्रास देऊ शकतात. पेरावरचे आवरण जाऊन डाग पडलेले असतात ती काठी टिकाऊ, मजबूत असते,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क : मिलिंद पाटील, कुडाळ- ९१३०८ ३७६०२.